डीजेमुळे पारंपरिक वाजंत्री व्यवसाय अडचणीत; वादकांवर उपासमारीची वेळ   

मंचर, (वार्ताहर) : लग्नसमारंभ आणि विविध धार्मिक कार्यक्रमात पूर्वी जुन्या वाजंत्री कलाकारांना महत्त्वाचे स्थान होते. मात्र, गेल्या काही वर्षात धार्मिक कार्यक्रमात डीजेचा वापर वाढल्याने पारंपरिक वाजंत्री व्यवसाय अडचणीत आला असून, जुने वाजंत्री कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
 
सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू असून, प्रत्येक मंगल कार्यालयासमोर डीजेचा आवाज ऐकू येत आहे. पूर्वी लग्न कार्यक्रमात सकाळीच वाजंत्री मंडळी नवरदेवाची गावातून मिरवणूक काढत तसेच दुपारी लग्न लागण्याअगोदर नवरदेवाला वाजंत्री मंडळींसोबत वाजत गाजत मंडपात आणले जायचे, लग्न मंडपात दिवसभर सनई, पीपाणी वाजवणारे वाजंत्री मंडळी दिसून यायचे. रात्री वरातीतही वाजंत्री मंडळी मोठ्या प्रमाणात असायची. मात्र आता लग्नसमारंभात डीजे दिसत आहे.
 
गावात असलेल्या विविध जत्रा, यात्रा, देवाच्या उत्सव कार्यक्रमात देखील वाजंत्री मंडळींना महत्त्वाचे स्थान होते. देवाची पालखी मिरवणूक, मांडव डहाळे यासाठी वाजंत्री मंडळींना सुपारी दिली जायची. मात्र आता याची जागा सुद्धा डीजेने घेतली आहे. सध्याच्या काळात लग्न वरातीत डीजेवर लाखो रुपये खर्च केला जात आहे. रात्रीच्या वेळी लायटिंगचा झगमगाठ, डीजेचा दणदणाट सर्वत्र पाहायला मिळत आहे. पूर्वीपासून वाजंत्री मंडळीमध्ये जुने जाणते कलाकार असायचे, त्यानी त्यांच्या वाढवडीलाकडून ही कला आत्मसात केलेली असायची. ही कलाच त्यांच्या उत्पन्नाचे साधन असायचे. मात्र आता वाजंत्री मंडळींवर डीजेच्या दणदणाटामुळे  उपासमारीची वेळ आली असून सनई, चौघडा, पिपाणी, बासरी, ताशा वाजवणारी ही मंडळी कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत.

Related Articles